योग्य वेळी योग्य प्रमाणात पिकांना खते दिली तर उत्पन्नात १५ टक्क्यांची वाढ होऊ शकते.
कृषी तज्ञ, श्री. योगेश शिनगारे
पिकांच्या गरजेनुसार पिकांना खते द्यावीत. वेळ निघून गेल्यावर अथवा गरजेपेक्षा जास्त दिलेली खते, उत्पादन खर्चात वाढ करतात आणि जर योग्य वेळी योग्य प्रमाणात पिकांना खते दिली तर उत्पन्नात १५ टक्क्यांची वाढ होऊ शकते आणि उत्पादन खर्चही कमी होऊ शकतो. असे प्रतिपादन कृषी तज्ञ मा. श्री योगेश शिनगारे यांनी केले.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कापूस आणि मका : लागवड आणि मूलद्रव्ये ( खते) व्यवस्थापन या खास शेतकरी वर्गासाठी आयोजित विषयावर व्याख्यानमालेत ते बोलत होते. त्यांनी शेतकरी बांधवांना मका आणि कपाशी पिकाची लागवड कशी करावी? तसेच मूलद्रव्ये पिकांना देताना काय काळजी घ्यावी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेतकरी बंधूंनी आता ते पिकवत असलेल्या नाशवंत पिके जसे की कांदा, आद्रक, हळद आणि भाजीपाला उत्पादनाच्या २५% भागावर प्रक्रिया करण्यासाठी युनिट उभारावे. जेणे करून कमी बाजारभाव
मिळालेल्या पिकाच्या खर्चाचा बोजा शेतकऱ्यावर पडणार नाही.तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतकरी व्यापाऱ्यांचा विळख्यातून बाहेर पडू शकतो. गट शेतीच्या माध्यमातून चांगलें उत्पन्न मिळवू शकतो.
यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर कृषिभूषण अजय जाधव,आर. व्हीं शिंदे, राजेंद्र नलावडे, राजेंद्र पाटील, टी एस चव्हाण आणि वाचनालयाचे सचिव आर. के. पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले.